माणगाव : दीपक जाधव
कोकण किनारपट्टी परिसरात महाराष्ट्रातील इतर भागांपेक्षा सर्वाधिक पाऊस पडत असतो. त्यातही रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण सर्वाधिक आहे. गेले दोन दिवस पडणाऱ्या या लहरी पावसामुळे बळीराजा जरी सुखावला असला, तरी पावसाने मारलेल्या या जोरदार मुसंडीमुळे सामान्यांचे जनजीवन थोड्याफार प्रमाणात विस्कळीत झाले आहे.
सिंधुदुर्गात गेले दोन दिवस जोरदार पाऊस पडत आहे. याचा सर्वाधिक फटका बसला आहे तो माणगाव खोऱ्यातील गावांना. या भागातील ओहोळ - नदी तुडुंब भरून वाहत आहेत. माणगाव खोऱ्याची जीवनवाहिनी ठरलेल्या निर्मला नदीला पूर आला आहे. आंबेरी पुलावर पाणी आल्याने २७ गावांचा संपर्क तुटला आहे. यातच भरीस भर म्हणून की काय मोबाईल नेटवर्क, वीज यांचा लपंडाव सुरू झाला आहे.
शेतकऱ्यांनी भात लावणीला सुरुवात केली आहे. त्यातच मुसळधार पाऊस पडत असल्याने शेतातही पाणी साचल्याने, शेती कामाला विशेषता भात लावणीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. माणगाव खोऱ्यातील प्रत्येक गाव एका किंवा एकाहून अधिक पुलांना जोडलेला आहे. पावसाच्या आगमनापूर्वी परंपरेप्रमाणे बहुतांश नेतेमंडळी पुलांची उंची वाढवण्याची आश्वासने देतात. मात्र, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. माणगाव खोऱ्यातील नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत सावंतवाडी किंवा कुडाळ सारख्या शहरांशी संपर्क कसा करायचा? या यक्ष प्रश्न आ वासून येथील नागरिकांसमोर उभा आहे. रस्त्यावरील आखुड पुलांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गे लावावा अशी मागणी माणगाव खोऱ्यातील लोक करीत आहेत.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.