शासकीय कामाचा आठवडा पाच दिवसाचा*_
त्यातच कोलगाव तलाठी कार्यालयाला 'मन का हॉलिडे'
*-सावंतवाडी : विशेष प्रतिनिधी असीम वागळे-*
राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार सर्वच शासकीय कार्यालयांचा आठवडा पाच दिवसांचा करण्यात आला. त्यामुळे जनतेची होणारी गैरसोय व कामाचा वाढता ताण याची प्रचिती सर्वांनाच येत आहे. कोलगाव येथील तलाठी कार्यालयात बरेचसे ग्रामस्थ आपल्या कामानिमित्त आले असता, तलाठी कार्यालयास असलेले कुलूप पाहून त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला.
सावंतवाडी महसूल विभागाच्या निर्देशानुसार कोलगाव तलाठी कार्यालयासाठी आठवड्यातून सोमवार व गुरुवार हे दोनच दिवस तलाठी गावात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. इतर दिवशी तलाठी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात सातबारा संगणकीकरणासाठी उपस्थित असतील, असे निर्देश देण्यात आले आहेत. भौगोलिक संरचना पाहता कोलगाव गावात तीन महसुली विभाग असून कोलगाव, भोम व निरुखे असे त्यांचे महसूलवार विभाजन करण्यात आले आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता बहुतांश गावात कायमस्वरूपी तलाठी उपलब्ध नसल्याने इतरत्र गावातील तलाठ्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात येतो. यामुळे संपूर्ण सिंधुदुर्गवासियांना अनेक शासकीय कागदोपत्री समस्यांना तोंड द्यावे लागते. कोलगाव ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार मागील सोमवारी तलाठी कार्यालय उघडले गेले होते. पण त्यानंतर अद्याप पर्यंत सदर कार्यालयाला टाळे लावलेले दिसत आहे. तरी यासंबंधी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता, त्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित तलाठ्याला दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ न शकल्यामुळे नेमके कार्यालयास न येण्याचे कारण अस्पष्ट राहिले आहे. तलाठी रजेवर असले तरी संबंधित कार्यालयातील इतर कर्मचारी सुद्धा उपस्थित नसल्याने संपूर्ण महसुली कागदोपत्री कामे अर्धवट स्थितीत पडून आहेत. एकीकडे डिजिटलायझेशनच्या नावाखाली आठवड्यातील तीन दिवस तलाठी कार्यालय बंद व इतर दिवशी *शासकीय सोंग* त्यामुळे सामान्य नागरिक बेहाल झाले आहेत. संबंधित कार्यालयाने योग्य ती सुधारणा करून प्रशासन सुव्यवस्थित करावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत तलाठी कार्यालय नियमित व वेळेत सुरू न राहिल्यास उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.