Wednesday, June 10, 2020

रायगड जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत

रायगड जिल्ह्यातील ८२० गावांचा वीजपुरवठा सुरळीत
प्रकाशदूतांकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम
वाशी मंडलातील बहुतांश गावे पुन्हा उजळली

मुंबई : कोंकण मिरर वृत्तसंस्था

अतितीव्र निसर्ग चक्री वादळाचा तडाखा बसलेल्या रायगड जिल्ह्यातील १९७६ पैकी ८२० गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरण यशस्वी झाले आहे. रायगड पाठोपाठ सर्वाधिक नुकसान झालेल्या वाशी मंडलातील ३०१ पैकी २८८ गावे अथक परिश्रमातून पुन्हा प्रकाशित झाली आहेत. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या निर्देशानुसार उर्वरित गावांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी स्थानिक व जिल्ह्याबाहेरून आलेले महावितरण व कंत्राटदाराचे प्रकाशदूत अहोरात्र काम करीत आहेत.

महावितरणच्या पेण मंडलातील पेण, अलिबाग, रोहा, मुरुड, पाली, माणगाव, टाळ, पोलादपूर, महाड, गोरेगाव, श्रीवर्धन, म्हसळा या भागाला निसर्ग चक्री वादळाचा सर्वाधिक फटका बसला होता. त्यामुळे या भागातील ६ लाख ३५ हजार २८८ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला. यातील ३ लाख ६२ हजार २२१ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. वीज वितरण यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी स्थानिक व बाहेरून आलेले २०९ अभियंते, १२५५ टेक्निशियन, एजन्सीचे ११५४ कामगार अहोरात्र काम करत आहेत. वादळामुळे इएचव्हीचे बंद पडलेले ४ पैकी ३ उपकेंद्र सुरू करण्यात आली आहेत. ३३/११ केव्हीचे ३२ उपकेंद्र बंद पडले होते. त्यापैकी २७ उपकेंद्राचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. बाधित झालेल्या ६,७७३ रोहित्रांपैकी ३०९६ रोहित्र पूर्ववत करण्यात आली. उच्चदाबाचे ५,५०७ खांब व लघुदाबाचे ११,०८९ खांब जमीनदोस्त झाले होते. त्यातील उच्चदाबाचे ७०२ तर लघुदाब वाहिनीचे ५३५ खांब नव्याने उभारण्यात आले आहेत. वीज खंडित झालेल्या १८ पैकी २३ रुग्णालये, २,१३६ पैकी ८८२ पाणीपुरवठा योजना व ५४८ पैकी २७५ मोबाईल टॉवरचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले आहे.

वाशी मंडलातील पनवेल ग्रामीण, कर्जत, खोपोली व खालापूर या बाधित भागातील वीजपुरवठा खंडित झालेल्या ४ लाख ३४ हजार ५२७ पैकी ४ लाख ३१ हजार १८७ ग्राहकांची वीज पूर्ववत करण्यात आली आहे. बंद पडलेले सर्वच १४ उपकेंद्र व २७६ फीडर पूर्ववत करण्यात आले असून ३०१ पैकी २८८ गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. २,५९७ पैकी २,५३९ रोहित्र सुरू करण्यात आली असून उच्चदाबाचे १९२ पैकी १३४ खांब व लघुदाबाचे ४५९ पैकी १३२ खांब नव्याने उभारण्यात आले आहेत. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांकडून अहोरात्र प्रयत्नांची शिकस्त सुरू आहे.

रत्नागिरीत पावणेचार लाख ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत

रत्नागिरी जिल्ह्यात वादळामुळे वीज खंडित झालेल्या ४ लाख २१ हजार पैकी ३ लाख ७७ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. हर्णे व केळोशी फाटा हे दोन उपकेंद्र वगळता ४५ उपकेंद्राचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. बुधवारी रात्री उशिरा किंवा गुरुवारी सकाळी या दोन्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही स्थानिक व बाहेरून आलेल्या अभियंते, कर्मचारी व कामगारांच्या अथक मेहनतीतून वीज वितरण यंत्रणेच्या दुरुस्तीची कामे युद्धस्तरावर सुरू आहेत.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.