विशेष प्रतिनिधी : अभय जाधव
जिल्ह्यात आजमितीस एकूण 492 व्यक्ती अलगीकरणात असून त्यापैकी 400 व्यक्तींना घरीच अलगीकरण करण्यात आले आहे. तर 82 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरण कक्षामध्ये आहेत. जिल्हा रुग्णालयाने आजपर्यंत पाठवलेल्या 197 पैकी 160 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाले आहेत. अजून 37 नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. सध्या जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये 48 रुग्ण दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी एकूण 2694 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
लॉकडाऊनच्या काळात आरोग्य यंत्रणेमार्फत खालासेमिआचे 10 रुग्ण, डायलेसिसचे 35 रुग्ण आणि केमो थेरपीचा एक रुग्ण यांना सेवा देण्यात येत आहे. जिल्ह्यातील निवारा केंद्रांच्या ठिकाणी असलेल्या 227 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून त्यांचे समुपदेशनही करण्यात आले आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत 11 मजूर, बेघर व कामगार कॅम्प असून त्याठिकाणी सध्या 222 जन वास्तव्यास आहेत. त्यांच्या निवासासह जेवण, चहा व नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
सध्या जिल्ह्यामध्ये संचारबंदीमध्ये कोणत्याही प्रकारची शिथीलता देण्यात आलेली नाही. जीवनावश्यक वस्तूंची व अत्यावश्यक सेवांची वाहतूक सुरू राहणार आहे. तसेच भाजीपाल्याची दुकाने, किराणा मालाची दुकाने सुरू राहणार आहे. जिल्हा प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे गरजेचे असलेल्या कामांना परवानगी दिली आहे. पण, त्यासाठी मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत. सामाजिक अंतर राखणे, नागरिकांशी कामगारांची थेट संपर्क येणार नाही याची दक्षता घेणे अशा स्वरुपाच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचे काटेकोर पालन करत असल्याचे प्रतिज्ञापत्र संबंधितांकडून घेण्यात येत आहे. त्यानंतरच कामे सुरू करण्यास परवानगी देण्यात येत आहे. त्यामध्ये पूल, रस्ते, साकव यासह सरकारी कार्यालये यांच्या कामांचा समावेश आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासही संचारबंदी व कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याच्या सूचना देऊनच काम सुरू करण्यास परवानगी असणार आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.